

जालना : मोसंबी हब म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्हयात मोसंबीचे भाव २५ हजार रुपये टनावरून १७ हजार रुपये प्रति टनापर्यंत घसरल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंध्र प्रदेशातून येणाऱ्या मोसंबीची आवक वाढल्याने त्याचा फटका महाराष्ट्रातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
जालना जिल्ह्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे. यंदा अल्प पाऊस, वाढते तापमान आणि फळगळ यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यातच बाजारभावात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. जालना मोंढ्यात काही दिवसांपूर्वी मोसंबीचे भाव १८ हजार ते २५ हजार रुपये टन होते. मात्र आंध्र प्रदेशातुन येणाऱ्या मोसंबीमुळे मोसंबीच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे.
सध्या मोसंबीला प्रतिकिलो १० हजार ते १७ हजार रुपये प्रति टनाचा भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आंध्र प्रदेशातून बाजारपेठेत मोसंबीची आवक वाढण्यासह हवामानातील बदलाचा परिणाम मोसंबीच्या दरावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. जालना शहरातील नवीन मोंढ्यात असलेल्या मोसंबी मार्केटमधे मोसंबीची आवक दररोज सुमारे २५० ते ३०० टन होत आहे.
जालना येथून दिल्ली, जयपूर, कानपूर, मथुरा, कलकत्तासह इतर ठिकाणी ट्रकव्दारे मोसंबी पाठवली जाते. आंध्र प्रदेशातुन होणाऱ्या मोसंबीची आवक वाढल्यास सध्याच्या भावात अजूनही घट होण्याची भीती वर्तवली जात आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम मोसंबी बागांवर झाला असून मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
जालना जिल्ह्यात सध्या जरी मोसंबीची भाव कमी झाले असले तरी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ते वाढण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश मोसंबी तोडली जाणार असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे नोव्हेंबर व डिसेंबर पर्यंत मोसंबी झाडावर राहील. या शेतकऱ्यांनाच चांगल्या भावाची अपेक्षा करता येणार आहे.