जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंटस बँकेत घोटाळा झाल्याने ही बँक बंद करण्यात आली आहे. या बँकेत अडत व्यापाऱ्यांचे पैसे अडकल्याने व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे देता येत नसल्याने, व्यापारी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर अडत व्यापाऱ्यांनी २७ एप्रिल पासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
या बाबत अडत व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जालना मर्चंटस बँक बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मालाचे पैसे देतांना अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा २७ एप्रिलपासून सर्व व्यापारी एकत्र येऊन मोंढा बंद ठेवणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जालना मर्चंट बँक बंद झाल्याने शहरातील विविध व्यापारी व उद्योजकांचे व्यवहार अडचणीत सापडले आहेत.
व्यापारी व उद्योगावर बँकेत पैसे अडकल्याने गंभीर संकट ओढवले आहे. जालना शहरातील व्यापारावर जालना मर्चंटस बँक बंद झाल्याने गंभीर संकट ओढवले आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे स्टील उद्योगासह इतर व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अडत व्यापाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केल्यास शेतकऱ्यांनी शेतीमाल कोठे विकायचा हा प्रश्न उभा राहीला आहे.
संपास पाठिंबा
अडत व्यापाऱ्यांच्या या संपास दालमिल असोसिएशन व जालना खरेदीदार असोसिएशनने पाठिंबा व्यक्त केला आहे. अडत व्यापाऱ्यांचा संप झाल्यास मोंढ्यातील भुसार मालाचे सर्व व्यवहार ठप्प होणार आहे. संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाय योजना करणे गरजेचे आहे.