

जालना : सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सहा महिन्यांपासून पाठलाग करून तिच्याशी लज्जा वाटेल असे बोलणे तसेच तिला धमकावल्याप्रकरणी आरोपीला जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वरद ऊर्फ पुरुषोत्तम साईराज नायडू (वय २२, रा. कानडी मोहल्ला, सुपर मार्केटनगर, रामनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे.
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश मोरे यांनी सोमवार, दि. १० रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आरोपी वरद उर्फ पुरुषोत्तम साईराज नायडू याच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात २२ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय दंड विधानासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेच्या चौकशीत आरोपी हा पीडित मुलीचा सहा महिन्यांपासून पाठलाग करीत असल्याचे निष्पन्न झाले. तो मुलीचा मोबाईल क्रमांक मागत होता. मोबाईल क्रमांक न दिल्यास तुला रस्त्याने जाऊ देणार नाही, अशी धमकीही देत होता. एवढेच नव्हे, तर मुलीला अश्लील कॉल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने शिक्षण बंद करण्याची धमकी मिळाल्याने सुरुवातीला ही बाब घरच्यांना सांगितली नाही. मात्र, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास ती शाळेतून घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग करून घरापर्यंत येत तिच्याकडे पाहून हातवारे केले. या घटनेनंतर पीडित मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला.
यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. इंगेवाड यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. इंगेवाड यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, शेजारी, घटनास्थळ पंच आणि तपासिक अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला संबंधित कलमांन्वये दोषी ठरविले. त्यानुसार आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. शिवाय दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकिम यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलिस अधीक्षक तेघबिर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती तसेच न्यायालयीन अंमलदारांनी सहकार्य केले.
साक्षीदारांची महत्त्वाची भूमिका
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, शेजारी, घटनास्थळ पंच आणि तपासिक अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.