

जालना : जालना जिल्ह्यातील ७ मध्यम व ६० लघु प्रकल्पात केवळ १२.८०टक्के पाणीसाठा असल्याने जिल्हयावर पाणी संकट घोंगावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पाऊस लांबल्याने प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत असल्याने अवैध पाणी उपशास बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्प परिसरात पथके तयार करुन अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जालना जिल्हयात ७ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहेत.गतवर्षी चांगला पाऊस पडल्यामुळ उन्हाळ्यात पाणी साठा चांगला होता. मात्र अर्धा जुन महिना उलटुनही जिल्ह्यात पावसाचे आगमन न झाल्याने लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याची परिस्थीती चिंताजनक बनतांना दिसत आहे.
प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस न पडल्यास जिल्हयातील पाणी संकट गंभीर बनणार आहे. जिल्ह्यातील ६० प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा केवळ १२.५० टक्के आहे.त्यात २० प्रकल्पात २५ टक्कयांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ११ प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आहे.२४ प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे.तर पाच प्रकल्प कोरडे पडले आहेत.
जिल्हयातील ७ मध्यम प्रकल्पा पैकी ३ प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी, ३ प्रकल्पात ५० टक्कयापर्यत तर एका प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पात २०.७० टक्के पाणीसाठा आहे.जिल्ह्यात पाऊस लांबल्याने प्रकल्पातुन सिंचनासाठी पाणी देणे बंद करण्यात आले आहे.हा पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
जिल्हयात निर्माण झालेल्या पाणीबाणी परिस्थीतीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने अलर्ट होत प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.प्रकल्प परिसरातुन अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करण्यात येणार असल्याचा इशाराही पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
जालना जिल्हयात ६० लघु प्रकल्पा पैकी ५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.२४ प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस न पडल्यास जिल्हयातील पाणी संकट गंभीर स्वरुप धारण करण्याची भिती वर्तवली जात आहे.