

भोकदन : दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी (दि.२६) रात्री उशिरा भोकरदन तालुक्यातील नळणी ते राजुर या रस्त्यावर घडली. सुभाष कचरू साठे (वय ४०) व विकास साहेबराव साठे (वय ३८) व अनिल संतोष बोराडे (वय २०) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नळणी येथील सुभाष साठे व विकास साठे हे दोघे आपल्या दुचाकीने राजुरहुन नळणीला येत होते. नळणी हे गाव अवघे एक किलोमीटर बाकी राहिले असताना बरंजळा साबळे येथील अनिल बोराडे (वय २०) आणि समाधान सर्जेराव कोरके (वय २२) हे बरंजळा साबळे येथून नळणी मार्गे राजूरच्या दिशेने जात असताना यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला.
अपघात एवढा भीषण होता की, अपघातात सुभाष साठे नळणी, विकास साठे नळणी , अनिल बोराडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर समाधान सर्जेराव कोरके (रा. बरांजळा साबळे) हा तरुण गंभीर जखमी आहे. त्याला नळणी येथील ग्रामस्थांनी तात्काळ उपचारांसाठी शासकीय रुग्णालय जालना येथे पाठवल्याचे समजते.दरम्यान, याप्रकरणी राजुर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.