

जाफराबाद : नगरपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणी आणि सांडपाणी अनेक दिवसांपासून साचून राहत असल्याने अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगर पंचायत प्रशासनाने लक्ष घालून वाॅर्डात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाॅर्डमधील अनेक भागांत पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यातच सांडपाण्याचीही भर पडल्याने परिसर चिखलमय झाला आहे. कचऱ्याचे ढीग, झुडपे आणि साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांना दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही कठीण होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेकदा नगरपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.