

Irregularities regarding construction workers' kits; Labour Officer Jadhav arrested
परतूर, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांमधील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून तत्कालीन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल मानसिंग जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, परतूर येथे बांधकाम कामगारांचे अत्यावश्यक घरगुती संच बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देणारे अधिकारीच पुढे या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोरगरीब बांधकाम कामगारांच्या हक्काचे १०० ट्रॅक साहित्य परस्पर विकल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.
परतूर शहरातील लालबहादूर शास्त्री परिसरात २३ एप्रिल २०२६ रोजी बांधकाम कामगार सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आयशर (क्र. एमएच-११-एएल-५८१५) ट्रक अडवून तपासणी केली होती. या वाहनामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत १६६ कामगारांसाठी देण्यात येणारे अत्यावश्यक संच आढळून आले होते. या संचांची किंमत सुमारे ११ लाख २४ हजार ६५० रुपये, तर वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १६ लाख २४ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
कामगारांना देण्यात येणारे साहित्य अधिकृत पद्धतीने वितरित न करता परस्पर वळविले जात असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला होता. या व्यतिरिक्त यदलापूर येथे ३३३ संच। ५४ लाख ६७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल मध्यरात्री विक्रीसाठी घेऊन जात असताना ट्रक पकडण्यात आला होता.
तक्रारदारच बनला आरोपी
या प्रकरणात सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी स्वतः परतूर पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. मात्र, पुढील तपासादरम्यान याच प्रकरणातील कथित गैरव्यवहारात अमोल जाधव यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने शासनाच्या वतीने गुन्ह्याची तक्रार केली, त्याच अधिकाऱ्यावर पुढे अटकेची कारवाई झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले.