

Illegal tree felling wreaks havoc in Talani area
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील तळणीसह इतर दहा गावांमध्ये अवैध वृक्षतोडीने कहर केला आहे. सर्रासपणे वृक्षतोड करुन लाकडाची वाहतुक केल्या जात आहे. याकडे मात्र, वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात तुलनेने वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. कुऱ्हाड बंदी असताना सर्रासपणे उभ्या झाडांवर आऱ्या चालवल्या जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. मंठा तालुक्यातील कानडी, देवठाणा, ऊस्वद, वडगाव सरहद, कोकरबा, शिरपूर, लिंबखेडा, वाघाळा, टाकळखोपा, वझरसरकटे, भुवन, बेल-ोरा, किर्ला, जांभरून, गारटेकी, दहिफळ खंदारे आदी दहा गावात गेल्या काही दिवसांपासून हिरवीगार व डेरेदार झाडे दिवसाढवळ्या तोडली जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कापलेली झाडे ट्रॅक्टरमधून खुलेआम वाहतूक केली जात असतानाही वनाधिकारी व वनपाल मूकदर्शक असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तळणीमंठा तसेच ऊस्वदमंठा या महामार्गावर दररोज लाकूड भरलेले ट्रॅक्टर धडधडीतपणे धावताना दिसत आहेत. आंबा, निंब, सागवान यांसह विविध जातींच्या झाडांची निर्धास्तपणे तोड व विक्री सुरू असून, संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना अभय मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हरितविकासाचा गजर करत असताना, दुसरीकडे प्रशासनातील काही भ्रष्ट घटकांच्या मूकसंमतीने तळणी परिसरातील जंगल उजाड होण्याच्या मार्गावर आहे. शेतांच्या धुऱ्यांवरील आडजातीची झाडेही मोठ्या प्रमाणावर कापली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अवैध वृक्षतोड थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विनापरवाना झाडतोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा तळणीसह संपूर्ण परिसर उजाड होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
दहा गावांत वृक्षतोड मंठा तालुक्यातील कानडी, देवठाणा, ऊस्वद, वडगाव सरहद, कोकरबा, शिरपूर, लिंबखेडा, वाघाळा, टाकळखोपा, वझरसरकटे, भुवन, बेलोरा, किर्ला, जांभरून, गारटेकी, दहिफळ खंदारे आदी दहा गावात अवैध वृक्षतोड होत आहे.