वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा : अंतरवालीत होत असलेली गर्दी हा जनतेचा आक्रोश आहे. ही आक्रोशाची लाट आपल्याला विजयाकडे नेणार आहे. या लाटेत सत्ताधारी होरपळून जातील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वेळ पडली तर मराठे भाजपला धडा शिकवतील, असेही जरांगे यांनी सांगितले.
जरांगे यांनी गुरुवारी अंतरवालीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, जिथे आम्ही अन्नाची अपेक्षा केली तिथे आमच्या तोंडात विष ओतण्याचे काम केले. आज उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. काही ठरवण्यासाठी ही बैठक नव्हती. या बैठकीत इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने त्यावर चर्चा झाली.
२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. वेळ गेल्यानंतर या भेटी, चर्चेला महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी या भेटीवर दिली.