

'Har Ghar Tiranga' campaign through the Tiranga Yatra
जालना, पुढारी वृत्तसेवाः आगामी 'हर घर तिरंगा' अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्ह्याची संयुक्त नियोजन बैठक भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाली.
या बैठकीस भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर वंदना मगरे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, देवदास कुचे, संध्या देठे, जिजाबाई जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेजूळ, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, गोविंद ढेंबरे, रमेश भापकर, शिवप्रकाश चितळकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत १० ते १३ ऑगस्टदरम्यान तिरंगा यात्रा, युवक व महिला मोर्चाच्या सहभागातून जनजागृती, शहीद स्मारक व महापुरुषांच्या स्मारक परिसरात स्वच्छता अभियान, तसेच वीर सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. तसेच १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविणे, सामाजिक माध्यमांवर अभियानाचा व्यापक प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी भास्कर दानवे म्हणाले, "हर घर तिरंगा' हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयी अभिमान जागविण्याचा लोकसहभागाचा उत्सव आहे. प्रत्येक बूथ, प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक घरापर्यंत हे अभियान पोहोचवून जालना जिल्हा राज्यात राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोपान पेंढारकर, सिद्धिविनायक मुळे, रमेश गौरक्षक, राजेंद्र भोसले, सुहास मुंडे, सुधाकर शिंदे, अकबर परसूवाले आर्दीसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अभियान समाजाला राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे
माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि शहीद जवानांच्या बलिदानाची आठवण करून देणारे हे अभियान समाजाला राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे आहे. युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंग्याचा सन्मान राखत प्रत्येक नागरीकापर्यंत राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवावा, असे ते म्हणाले.