

घनसावंगी ः बदलत्या हवामानामुळे आणि शेती उत्पादन खर्चात होत असलेल्या वाढीमुळे शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत गणेशपूर येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर गाडेकर आणि अभिषेक गाडेकर या बंधूंनी डोंगराळ व खडकाळ भागात डाळिंबाची यशस्वी शेती फुलवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
डोंगराळ भागात शेती करताना पाण्याची कमतरता, जमिनीची प्रतिकूल रचना आणि नैसर्गिक अडचणी यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत गाडेकर बंधूंनी नियोजनबद्ध पद्धतीने डाळिंब बागेची उभारणी केली.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचे संतुलित व्यवस्थापन तसेच रोग व किडींचे वेळेवर नियंत्रण यामुळे त्यांच्या बागेची चांगली वाढ झाली आहे.
आज त्यांच्या डाळिंब बागेतील झाडे भरघोस फळधारणेने बहरली असून लालबुंद आणि दर्जेदार फळांनी बाग सजली आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे बाजारपेठेतही त्यांच्या डाळिंबाला चांगली मागणी मिळत आहे.
शेतीमध्ये सातत्य, मेहनत आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास डोंगराळ भागातही फळबाग शेती यशस्वी होऊ शकते, हे गाडेकर बंधूंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.