

Jalna rains, crops Kharip got life
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून पडणारा रिमझिम पाऊस गुरुवारी दिवसभर सुरूच होता. ढगाळ वातावरण व पावसामुळे दिवसभर जिल्ह्यात सूर्यदर्शन होऊ शकले नाही. या पावसाला जोर नसला तरी पेरणी झालेल्या जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांना जिवनदान मिळाले आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळपासून हजेरी लावली. रिमझिम पावसामुळे जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी पेरणी झालेल्या ४ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकाना जिवनदान मिळाले आहे. मे महिन्यात चांगला पाऊस पडल्यानंतर खरिपाची पेरणी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी गडबड करून झटपट खरिपाची पेरणी उरकली.
मात्र पेरणी होऊन कोवळी पिके जमिनीवर डोके काढताच पावसाने दडी मारल्याने कपाशी, सोयाबीन, मका, मूग, तूर, उडीद आदी पिके माना टाकू लागली होती. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हतबल झालेला असतानाच बुधवारी सायंकाळपासून पावसास सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर हा पाऊस पडत होता. पावसास जोर नसला तरी खरिपाच्या कोवळ्या पिकांना या पावसाने जिवनदान दिले आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जवळपास ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.
या पावसामुळे रखडलेली पेरणी पुन्हा सुरू होणार आहे. जिल्ह्यात १ ते २६ जूनपर्यंत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्यात पावसाचा जोर इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असल्याचे दिसत आहे. जालना जिल्ह्यात १ ते २६ जूनपर्यंत जालना १११, बदनापूर १४१.३०, भोकरदन १२५.६०, जाफराबाद १४३.५०, परतूर ४८.१०, मंठा ७३.००, अंबड ८१.२०, घनसावंगी ५७.५० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आता मोठ्या पावसाची गरज आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांत २६ जून रोजी सकाळी आठ वाजेपर्यत मागील चोवीस तासांत २२.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात जालना १९.८०, बदनापूर १७.४०, भोकरदन ४८.६०, जाफराबाद ५१.२०, परतूर ७.५०, मंठा २०.२०, अंबड ७.८०, घनसावंगी ७.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.