

Drought of female doctors in urban health centers in wards 10,11
जालना, पुढारी वृत्तसेवा शहरातील प्रभाग क्रमांक १० व ११ मधील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये महिला डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सायराबी फकरूल्ला खान यांनी केली आहे.
या भागातील आयुष्यमान आरोग्य मंदिरात दररोज शेकडो महिला रुग्ण तपासणीसाठी येतात, मात्र महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची अक्षरशः फरफट सुरू आहे. महिलांच्या तपासणीसाठी पुरुष डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत असल्याने अनेक महिला तपासणीच टाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मागील तीन महिन्यांपासून डॉक्टरही नियमित उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी गरीब, गरजू आणि महिला रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडत आहे.
ही गंभीर बाब नगरसेविका सायरावी फकरूल्ला खान यांच्या निदर्शनास येताच, त्यांचे पती फकरुल्ला खान यांनी तत्काळ एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी संबंधित नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, महिला डॉक्टर नसल्याचं स्पष्टपणे उघड झाले. महिला रुग्णांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या बेजबाबदार आणि निष्काळजी कारभारावर एमआयएमने तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजेद, फकरूल्ला खान, शेख सोनु, शेख तनवीर, झाहीर भाई, यांचे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.