

Crushing capacity to increase up to 15,000 metric tons
घनसावंगी / तीर्थपुरी, पुढारी वृत्तसेवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात अतिरिक्त उसाची चिंता करण्याची गरज राहणार नाही. समृद्धी साखर कारखान्याचे युनिट क्रमांक २ आगामी हंगामासाठी सज्ज होत असून, यामुळे कारखान्याची गाळप क्षमता ५,५०० वरून थेट १५,००० मेट्रिक टन इतकी वाढणार असल्याची महत्त्वाची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली आहे.
भव्य मानेपुरी येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मानेपुरी येथील उसाचा प्रश्न सोडविल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांचा विशेष सत्कार या मेळाव्यात करण्यात आला.
४० वर्षापूर्वी साखर कारखानदारी हे घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील राजकारणाचे केंद्र होते, ज्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागला. ही परिस्थिती बदलण्यासाठीच समृद्धीची उभारणी करण्यात आली आहे. 'आम्ही शेतकऱ्यांना उसाच्या राजकारणातून मुक्त करण्याचे वचन दिले होते आणि ते पूर्ण करून दाखवले आहे, "असे सतीश घाटगे यांनी यावेळी सांगितले.
२०२५-२६ च्या हंगामात कारखान्याने विक्रमी वेळेत उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या यशस्वी वाटचालीमुळेच आता युनिट २ च्या माध्यमातून कारखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ करण्यात येत असून आगामी गाळप हंगामात समृद्धीची गाळप क्षमता आता १५ हजार मेट्रिक टन पर्यंत होणार त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस गाळपाची चिंता राहणार नाही, असे घाटगे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी
गाळप क्षमता वाढल्यामुळे आता आपल्या भागातील ऊस बाहेरील जिल्ह्यांतील कारखान्यांना देण्याची गरज राहणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देत, हक्काचा कारखाना म्हणून समृद्धी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास यावेळी सतीश घाटगे यांनी यावेळी दिला.