

Crops have started withering due to a lack of water
लोणार, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर तालुक्यातील लोणार- भायगावसह परिसरात पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, पाण्याअभावी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, मका, उडीद आदी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतांमध्ये जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे.
सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा धरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस दमदार पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यंदाच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिलेले नाही.
पाऊस चांगला होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या कडील असलेली माया पुंजी महिलांचे सोन नान विकुन खते बियाणे औषधी घेऊन काळ्याआईची ओटी भरली व पेरण्या केल्या. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली; मात्र त्यानंतर पावसाळ्याच्या पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. परिसरातील अनेक शेतांमध्ये जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. विशेषतः हलक्या व मध्यम जमिनीतील ओलावा जवळपास संपुष्टात आल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. सततच्या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा आणि परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा," अशी मागणी लोणार भायगाव सह परिसरात किनगाववाडी, कौचलवाडी, खेडगाव, देशगव्हाण, माहेर भायगाव, चीकणगाव, बधापुर, आवा, अंतरवाला, नानेगाव येथील शेतकरी यांनी केली आहे.