

जाफराबाद ः केंद्र व राज्य सरकारच्या महागाईविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जाफराबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी शहरात बैलगाडीसह भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील वाकडे, काँग्रेस नेते सुरेश गवळी, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे तसेच अजय बनकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बैलगाडीच्या माध्यमातून महागाईमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असलेल्या परिणामांचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचे वक्त्यांनी सांगितले. मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महागाई नियंत्रणात आणा
सरकारने महागाई नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनतेचा रोष आणखी तीव्र होईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.