

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत मी कोणाचेही उमेदवार पाडले नाहीत. मराठ्यांनी पाडले, मी गरीब माणूस आहे. हे मात्र खरे आहे. गरीबांत किती ताकत आहे, हे देशाने आणि महाराष्ट्राने बघितले. आता विधानसभा निवडणुकीसाठी पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. त्यासाठी एक ते दोन दिवस पुरेसे आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ७) येथे सांगितले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
मी सामाजिक कामासाठी बाहेर आहे. हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि जिंकायचा आहे. मला हे बघायचे होते, उमेदवार दिले होते, आजही लोक तितकेच आहेत. लोकांमध्ये काही फरक पडलेला नाही, ते म्हणतात तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाले, पाडा तर पाडा. उमेदवार ज्यांना माघार घ्यायला लावली. त्यांचे पण काही म्हणणे नाही. काहींना समाजाच्या जीवावर काही व्हायचे आहे, समाजाला काही द्यायचे काम नाही, आणि ते समाजासाठी आमच्यासोबत नव्हते. पण मला आणि माझ्या समाजाला एकीचा फायदा समाजासाठी करायचा आहे, अगोदर मराठा समाजाने आपल्या लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर काढायचे, असेही जरांगे म्हणाले. आमच्या नादी लागू नका, आम्ही तुमचे काही विरोधक नाहीत, असा इशारा जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला.
ते म्हणाले की, मला माझ्या समाजाला भेटायला जायचे आहे, आमचा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. समाजासाठी मी पुढे गेलो तरी मागे का सरकू नये? माझ्या समाजासाठी मी मागे सरकलो. एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही. पण त्यामध्ये एक-दोन विषय किचकट होते. पण तो विषय मी आता सोडून दिला आहे. आता ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने चालत राहावे. तुमच्या भूमिकेचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आता आम्हाला काय माहित कुणाचा फायदा कुणाला होईल, असे सांगितले.