

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) परिसरात काल सायंकाळी वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक २०८ मधील शेतात बांधून ठेवलेल्या बैलावर अचानक वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. हा बैल तुषार फकीरा भुते (रा. पारध) यांच्या मालकीचा असून शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अहवालात वीज पडल्यामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.