

BJP has no right to say Vande Mataram: Uddhav Thackeray
परतुर, पुढारी वृत्तसेवाः वंदे मातरम्ला १५० वर्ष पूर्ण झाली याचा आम्हाला, देशवासीयांना अभिमान आहे. वेगवेगळ्या मार्गाने भारतमातेला लुटणाऱ्या भाजपाला वंदे मातरम् बोलण्याचा अधिकार नाही. जे स्वतः चा पक्ष आत्मनिर्भर करू शकत नाहीत ते काय भारताला आत्मनिर्भर करणार. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने केलेली मदत अतिशय तोकडी आणि तुटपुंजी आहे. एक प्रकारे सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथे शेतकऱ्यांशी उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे, खा. संजय जाधव, शिव-सेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा प्रमुख महेश नळगे, माधवराव कदम, पी. एन.यादव, प्रदीप बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटोदा येथील शेतकरी संजय खवल, ताराबाई हरदास, पांडुरंग बोनगे या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समक्ष आपल्या व्यथा मांडल्या. जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास १ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकरी आत्महत्यांचे पाप केवळ सरकारचे असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो पर्यंत ५० हजार रुपये हेक्टरी मदत सरकार करत नाही, तो पर्यंत भाजपा युतीला मत नाही. असे फलक गावोगावी लावा. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांनी सरकारवर धावून जाण्याची वेळ ही वेळ आहे. ही वेळ रडत बसण्याची नाही तर लढण्याची असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अल्पावधीत आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख महेश नळगे याचे जाहीरपणे अभिनंदन केले. शिव सेनेची मुळे मजबूत असल्याने तसेच गावखेंड्यातल्या तरुणांचे पाठबळ असल्याने शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही असे पुढे बोलताना ठाकरे म्हणाले. तीन तिघाडा आणि काम विघाडा असे राज्यातील महायुतीचे सरकार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या, तुमच्या कुठल्याच पॅकेजची किंवा मदतीची आम्हाला गरज नाही. राज्यातील सरकार लबाडाचे सरकार असल्याचा आरोप यावेळी खा. संजय जाधव यांनी केला. पाटोदा सर्कलमधील अनेक गावातील शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुम्हणे हातात घ्या
यावेळी अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. संकट काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकार विरोधात रुम्हणे हातात घेण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले.