

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील ग्रामस्थांना गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी बसच्या चुकीच्या नियोजनाचा फटका बसत आहे. सकाळी 10 वाजता येणारी एकमेव बस गावातील जुन्या बस थांब्यावर न येता, गावापासून 1 किलोमीटर लांब बाहेरच थांबवली जात आहे. यामुळे महिला, वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांचे मोठे हाल होत असून, या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
नेमकी समस्या काय?
सावंगी अवघडराव येथील नागरिक आणि प्रवासी प्रामुख्याने सकाळी 10वाजता येणाऱ्या बसवर अवलंबून असतात. ही बस ग्रामस्थांना तालुक्याला जाण्यासाठीचा एकमेव आधार आहे. मात्र, काही महिन्यांपासून ही बस गावात न येता मुख्य रस्त्यावरूनच गावापासुन एक किमी अंतरावरून निघून जाते.त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. अनेकदा बस निघून गेल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याचे चित्र आहे.
गावातील जुना बस थांबा सुस्थितीत असूनही, चालक आणि वाहक जाणीवपूर्वक बस गावात आणत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भर उन्हात किंवा पावसात 1 किलोमीटर चालणे वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी कठीण होत आहे.
प्रशासनाला इशारा
ॲड. छाया प्रविन लोखंडे यांनी आगारप्रमुख, भोकरदन यांना निवेदन दिले आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बस जुन्या थांब्यावर थांबवण्याचे आदेश दिले नाहीत, तर नागरिकांसह बस आगारासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला.