

भोकरदन : तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या शेतीकामांना मोठी गती मिळाली आहे. सुरुवातीला झालेल्या पेरण्यांनंतर पावसाने ओढ दिली होती, मात्र नुकत्याच झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसानंतर जमिनीला वाफसा आल्याने तालुक्यात मक्याच्या पिकात कोळपणीच्या (डवरणीच्या) कामांना वेग आला असून बळीराजा शेतीकामात पूर्णपणे व्यस्त झाला आहे.
भोकरदन परिसरात मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या मक्याचे पीक कोळपणीच्या अवस्थेत आले आहे. पिकातील तण काढण्यासाठी आणि पिकाला मातीचा भर देऊन त्याची वाढ जोमाने व्हावी यासाठी शेतकरी कोळपणीला प्राधान्य देत आहेत.
शेतात दोन बैलांच्या जोडीने डवरे/कोळपे चालवून मक्याच्या दोन ओळींमधील गवत साफ केले जात आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे माती मऊ झाली असल्याने ही कामे सुलभ होत आहेत.
सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, ऐन वेळेवर आलेल्या दमदार पावसामुळे मका, कापूस , सोयाबीन , तुर यांसारख्या पिकांची स्थिती सुधारली आहे. मक्याची कोळपणी वेळेत झाल्यास पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते, असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र सकाळी लवकरच शेतकरी बैलांच्या जोड्या घेऊन शेताकडे निघताना दिसत असून, मजुरांच्या साहाय्याने कोळपणीसोबतच खुरपणीच्या कामांनाही वेग आला आहे. या पावसामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून या पुढील काळात पाऊस वेळेवर आल्यास यंदा उत्तम पिकाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.