

Approval granted for Farmer ID applications of 4.46 lakh farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी आणि शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्यार फार्मर आयडीसाठी सुमारे जालना जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ५६२ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार २१ अर्ज प्रशासनाकडून मंजूर करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील 'कॉमन सर्व्हिस सेंटर्स' म्हणजेच सीएससी केंद्रांनी मोलाची भूमिका बजावली आहे. एकूण नोंदणीपैकी तब्बल ४ लाख ३७ हजार ७८६ नोंदणी एकट्या सीएससी केंद्रांमार्फत झाली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी स्वतः ८,२४६, तर महा-ई-सेवा आणि इतर माध्यमांतून उर्वरित नोंदणी केली आहे.
तालुकानिहाय आकडेवारीत भोकरदन अव्वल, तर अंबड दुसऱ्या स्थानी जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांचा आढावा घेतला असता, नोंदणी पूर्ण करण्यात भोकरदन तालुक्याने बाजी मारली आहे. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ८१,६९२ नोंदणी पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल अंबाड तालुक्यात ७०,१२४ आणि घणसावंगी तालुक्यात ६६,०९१ नोंदणी झाली आहे. प्रशासकीय स्तरावर पडताळणी सुरू जिल्ह्यात सध्या २,३५० अर्जाची पडताळणी सुरू असून, २,१५० अर्ज अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून हे प्रलंबित अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
फार्मर आयडीसाठी २० जूनपर्यंत मुदत
पी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी २० जून पर्यंत आपली फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाच्या २०२५ मधील निर्णयानुसार १५ एप्रिल २०२५ पासून पी.एम. किसानसह इतर सर्व शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.