

Anwa: Pulse prices have increased: Housewives' budgets have been disrupted
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : तूर डाळीचे वरण आणि भाताशिवाय अनेकांचे जेवण अपूर्ण मानले जाते. मात्र सध्या किरकोळ बाजारात डाळींच्या दरात किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींना भाववाढीची फोडणी बसल्याने वरणाची चव बिघडली आहे.
तेलानंतर आता डाळींच्याही दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले असून वरणालाच महागाईचा तडका बसला आहे. खरीप हंगामातील तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे, त्यातच बाजारात उपलब्ध तुरीची गुणवत्ता घसरली असल्याने दर्जेदार तुरीला अधिक मागणी आहे. परिणामी ऐन हंगामात तूरडाळीचे भाव वाढले आहेत. यंदा तुरीप्रमाणेच मूग आणि उडदाच्या उत्पादनातही ३० ते ४० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच डाळींच्या दरात वाढ झाली आहे. मागील तीन आठवड्यांत उडीद डाळ आणि तूरडाळीत सर्वाधिक तेजी दिसून आली.
उडीद डाळ क्विंटलमागे सुमारे २३०० रूपयांनी, तर तूरडाळ २००० रुपयाने महागली आहे मूग डाळीत ८०० रुपयांची वाढ झाली असून हरभरा डाळ आणि मठ डाळ प्रत्येकी ५०० रुपयांनी महागल्या आहेत.
बाजारात डाळवर्गीय शेतमालाची मागणी वाढली असून तूर, उडीद आणि मुगाला जास्त मागणी आहे. त्यामुळे या शेतमालाच्या दरात वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम डाळींच्या किरकोळ दरांवर होत आहे. पुढील काही दिवसांत तूरडाळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.
मागील काही दिवसांपासून शेतमालासह खाद्यतेल आणि डार्डीचे दर सातत्याने वाढत आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात जीवनावश्यक वस्तूमहाग झाल्याने वर-वधू पक्षांच्या खर्चात वाढ झाली असून त्यांच्या खिशावर मोठा ताण येत आहे.