

Activists should work as a medium for public service
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, जनसेवेचे माध्यम म्हणून काम करावे, असे प्रतिपादन माजी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील संजीवनी समाधी ध्यान योगपीठ केंद्रात उत्साहात पार पडले.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्काचे धडे देण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजप प्रदेश सचिव रेखाताई कुलकर्णी, घनसावंगी विधानसभा निवडणूक प्रमुख सतीश घाटगे, दीपक भैया ठाकूर, राजेश मोरे, निवृत्ती साळवे, गोविंद ढेंबरे, शिवाजी मोरे, विष्णुपंत जाधव, संजय आटोळे, संजय तौर यांच्यासह तिन्ही मंडळांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करताना रावसाहेब पाटील दानवे यांनी जनसंघापासून सुरू झालेला पक्षाचा संघर्षमय प्रवास आणि विचारधारा मांडली. प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळेच पक्ष आज या शिखरावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षण शिबिराच्या प्रास्ताविकात सतीश घाटगे यांनी घनसावंगी मतदारसंघातील पक्ष संघटनेच्या मजबुतीवर भर दिला. विचारांची स्पष्टता आणि संघटनेची शिस्त हीच विजयाची गुरुकिल्ली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदय मंत्र अंगिकारून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सज्ज राहण्याचे आवाहन या शिबिरात करण्यात आले. यामध्ये पक्ष संघटना वाढविणे, मतदार याद्या तपासणे, कल्याणकारी योजना राबविण्यात बाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
बांधणी भक्कम
या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून मतदारसंघातील बांधणी अधिक भक्कम होणार आहे. दिवसभर या शिबिरात कार्यकर्त्यांना विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.