

4,000 farmers deprived of ₹40 crore subsidy
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाडीबीटीच्या ४० कोटींच्या अनुदानापासुन जिल्ह्यातील चार हजार शेतकरी वंचित राहिल्यीने वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी दिनी मंजुरीपत्रांची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात आले.
कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेंतर्गत कृषी यंत्र, अवजारे व विविध कृषी साहित्य खरेदी करूनही जिल्ह्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांचे तब्बल ४० कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधत वडीगोद्री येथे तीव्र निषेध आंदोलन छेडले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १) सकाळी १० वाजता आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या कृषी यंत्र, अवजारे व साहित्य खरेदीच्या पूर्वसंमती मंजुरीपत्रांची होळी करून शासनाच्या निष्क्रिय आणि शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रलंबित अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कृषी यंत्रसामग्री खरेदी केली असून, शासनाच्या विलंबामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यंत्र आवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या सात महिन्यांपासून अनुदान रखडले आहे. कृषी दिनीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे येत असल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी व्यक्त केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, अंबड तालुका अध्यक्ष उमेश पाष्टे, तालुका उपाध्यक्ष अशोक गायकवाड, कार्याध्यक्ष मुकेश डुचे, ज्येष्ठ नेते बप्पासाहेब काळे, बाबासाहेब दखणे, अंकुश तारख, भारत उंडे आदींची उपस्थिती होती.
तीव्र आंदोलन करणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपयांहून अधिक अनुदान रखडले असून, शासनाने तातडीने निधी वितरित न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.