घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड महिन्यांपूर्वी तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील पंचधातूंच्या मुर्ती चोरीला गेल्या असून अद्याप कसलेही शोधकार्य समोर आले नाही. त्या निषेधार्थ जांबसमर्थ येथे सांप्रदायिक शक्ती प्रकटीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभरातील ६८ मठाधिपतींची निवेदने सादर केली. या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे (दि.१२) रोजी जांबसमर्थ येथील शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांची बुधवारी दुपारी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
देशभरातून विविध मठपतींच्या उपस्थितीत जांब येथे मुर्ती चोरीच्या तपासात प्रशासनाला जागे करण्यासाठी वज्रमूठ तयार केली होती. त्या अनुषंगाने गृहमंत्री व पोलीस महासंचालकांची मुंबई येथे जाऊन शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आ.कैलास गोरंट्याल, समर्थ वंशज भूषण स्वामी, सरपंच बाळासाहेब तांगडे,पंचायत समिती सदस्य सुशील तांगडे, उपसरपंच अरविंद पवार, समर्थ मंदिरा संस्थानचे सहसचिव संजयबप्पा तांगडे, निमंत्रित सदस्य तथा पत्रकार राजकुमार वायदळ, दीपक तांगडे, प्रसाद महाराज पाठक, युवराज आर्दड, प्रवीण तांगडे, अनंता तांगडे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना मंदिर संस्थान, ग्रामपंचायत व शिष्टमंडळाच्यावतीने निवेदने सादर केली. यावेळी बोलतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही हे प्रकरण अत्यंत चोखपद्धतीने हाताळत असून लवकरच यामागील गुन्हेगार समोर येतील. तसेच पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनीही तात्काळ जालन्याचे पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्याशी संपर्क साधून तपासाची गती जाणून घेत योग्य त्या सूचना केल्या.
गेल्या दीड महिन्यांपासून पोलिस यंत्रणा अनेक मार्गांनी तपास मोहिम राबवत असून कोणताही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला नाही. यावेळी मात्र पोलिसांनी मुर्ती चोरीबाबत उपयुक्त माहिती देणाऱ्यास जालना पोलिसांतर्फे दोन लाखांचे बक्षीस पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पत्रक काढून जाहीर केले आहे.
आम्ही गत दीड महिन्यांपासून संयमच ठेवत आलो. मात्र तपास काही केल्या पुढे जात नाही. रामभक्तांच्या भावना तीव्र होत असून, त्यांचा रोष वाढला आहे. शांतता मागार्नेच आम्हाला मूर्ती मिळावायच्या आहेत.19 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून 20 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा स्पष्ट इशारा भूषण स्वामींनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. यावेळी शेकडो रामभक्तांनी अनुमोदन दिले.