तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न मोठा अडचणीचा बनला आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अनुषंगाने प्रशासनाची वर्षानुवर्ष दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला वर्गासाठी स्वच्छतागृहाच्या प्रश्नासाठी मागील पंधरा वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. मोक्याच्या जागा अतिक्रमण करून इतर लोक उद्योग व्यवसायासाठी वापरत आहेत. यामुळे भाविक महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगर परिषदेच्या प्रशासनाने तातडीने महिलांची स्वच्छतागृह उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशी भाविकांची मागणी आहे.
तुळजापूर बसस्थानक येथे स्वच्छतागृहाची सोय आहे. परंतु या स्वच्छतागृहाची भाविकांना माहिती मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया भाविकांतून आहेत. त्याचबरोबर हे स्वच्छतागृहा मंदिरापासून लांब पल्ल्यावर असल्याने रात्रीच्या वेळी महिलांची होणारी गैरसोय अत्यंत गंभीर आहे. या प्रश्नाची जाणीव शहरातील नगरसेवक आणि समाजसेवक यांना असून देखील या प्रश्नावर कोणीही निर्णय भूमिका घेत नाही असे चित्र तुळजापुरात अनेक वर्षापासून आहे.
राज्य शासनाच्या वतीने तुळजापूर शहराच्या विकासासाठी विशेषतः बाहेरगावावरुन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी शासनाने यापूर्वी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना ५ कोटी रुपये त्यानंतर विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनुक्रमे 315 कोटी रुपये व १० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. यासाठी तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाची स्थापना देखील करण्यात आली. मात्र या काळात आमदार मधुकरराव चव्हाण आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ही मंडळी या प्राधिकरणाचे संचालन करीत होती. तरीदेखील महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न दुर्लक्षित आणि प्रलंबित राहिला आहे. अनेक भाविक अत्यंत संतापाने स्वच्छता घराच्या प्रश्नावर बोलतात तेव्हा त्यांना होणारा त्रास दिसून येतो.
जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तुळजापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतागृह होते त्या ठिकाणी सर्वेक्षण करून उभारण्याची मोहीम उघडली पाहिजे. अशी शहरातील जाणकार ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. शहरवासी यांचा पुढाकार होता तो अलीकडच्या काळात दिसून येत नाही.
स्वच्छतागृहाच्या बरोबर बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांना शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी मोफत थंड पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात यावी अशी भाविकांची मागणी आहे. शासन तुळजापूर शहराच्या आणि भाविकांच्या सुविधेसाठी रुपये निधी देत असताना नगरपरिषद प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी प्राधान्य देणारे निर्णय घेतले पाहिजेत. महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडविण्यात यावा व भाविकांना सर्वत्र मोफत थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी अपेक्षा नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांच्या आहेत. याशिवाय शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यानी देखील यावर दुर्लक्ष करु नये अशा प्रतिक्रिया नागिरकांतून येत आहेत.
तुळजापूरच्या रस्त्यावर महिलांची संख्या लक्षात घेता स्वच्छतागृहाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय पातळीने झाली पाहिजे या प्रश्नासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मंदिर संस्थांचे अध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नवीन आराखडा तयार करावा किंवा नव्याने होत असलेल्या शहर विकासामध्ये महिला स्वच्छतागृहाच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावे. राज्य शासनाने बस प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळे खूप मोठ्या संख्येने महिला भाविकांची गर्दी तुळजापुरात आहे ही बाब लक्षात घेता स्वच्छतागृहाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये अशी महिला भाविकांची मागणी आहे.
महेश चोपदार -शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट