

वसमत : गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे.
वसमत तालुक्यात तहसीलदार शारदा दळवी यांनी मागील अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कालावधीत वसमत तालुक्यातील तब्बल १५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २.९१ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय गुन्हेही दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी नांदेडहून येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई वसमत तालुक्यात असतानाही तहसीलदार दळवी यांच्यावर गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांना निलंबित केले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई असतानाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा दावाही केला जात आहे.
या संदर्भात दीपक कदम, अलोक इंगोले, करण जाधव, अंकुश कोरडे यांच्यासह नागरिकांनी शासनाकडे पत्र पाठविले असून तहसीलदार दळवी यांच्यावर झालेली कारवाई चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यांनी कठोर निर्णय घेतल्यामुळे काही जण दुखावल गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरील निलंबन रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.