

वसमत : वसमत तालुक्यात मागील चार दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या तालुका भर हळद काढणी चालू असून हळद उत्पादक शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट ओढावले आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे हळद पिकासह सर्वच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा हळद काढणी सुरुवात झाली आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे.
हळद पीक अवकाळी पावसामुळे भिजल्यामुळे त्याची बाजारपेठेत सुद्धा किंमत कमी होत असून याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. एकीकडे शासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी त्रस्त असून कुठल्याही शेतीमालाला योग्य ते भाव नसल्यामुळे शेतकरी पहिलाच मेटाकुटीला आला आहे.
दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचे धोरण व निसर्गाची अवकृपा यामुळे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उद्भवत आहे. वातावरण बदलीमुळे अवकाळीची येणे जाणे सुरू राहिली तर नक्कीच वसमत तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी तोट्यामध्ये जायला उशीर लागणार नाही.