हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंटेलीजन्स बेस इन्व्हेस्टीगेशनच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्हयात जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १६ मोबाइल, एक खंजर, चाकू, दुचाकीसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहापोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे उपनिरीक्षक डख उपस्थित होते. यावेळी कोकाटे यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी वसमत ते नांदेड मार्गावर कैलास कदम या मोबाईल विक्रेत्यास चोरट्यांनी लुटले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक घेवारे, जमादार नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, इरफ्फान पठाण यांची दोन पथके तैनात केली होती.
या पथकाने सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र फुटेज स्पष्ट नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली. मात्र इंटेलिजन्स इन्व्हेस्टीगेशनच्या माध्यमातून या पथकाने माहिती घेतली असता सदर तिघे जण नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांच्या पथकाने नांदेड येथून हरज्योतसिंग चरणजितसिंग बिंद्रा बलप्रितसिंग भूपेंद्रसिंग कदंब, रोहित मारोती जाधव (रा. वसरणी नांदेड) यांना अटक केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिघांनी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात सहा ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून सोळा मोबाईल, मोबाईल डिस्प्ले, दुचाकी, खंजर असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल पथकाला पाच हजारांचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितले.