सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचा मुंबईत समुद्रात उड्या घेऊन जलसमाधीचा इशारा

सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचा मुंबईत समुद्रात उड्या घेऊन जलसमाधीचा इशारा

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील दहा शेतकरी मागील चार दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बुधवारी (ता.29) मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविण्यात आले. जीव गेला तरी चालेल पण शेती वाचली पाहिजे अशी भुमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सेनगाव तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात लागवडीचा खर्च निघाला नाही तर रब्बी हंगामात पेरणीसाठी पैसे नाहीत. या परिस्थितीत बँकेचे व इतर कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्‍वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, संतोष वैद्य, गजानन जाधव, दीपक कावरखे, विजय कावरखे, धिरज मापारी यांनी अवयव विक्रीचा निर्णय घेतला. यामध्ये किडणी, लिव्हर अन डोळे विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले. त्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबियांनीही अवयव विक्रीला काढले आहेत. दरम्यान, मुंबईत मंत्रालयासमोर बसून अवयव विक्रीसाठी या शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून मुंबईत ठाण मांडले आहे. हाती पैसे नसल्यामुळे एकवेळ भोजन करून शेतकरी मुंबईत बसले आहेत. मात्र त्यानंतरही शासनाने त्यांची दखल घेतली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, आमचे अवयव खरेदी करावे अन्यथा कर्ज माफ करावे अन्यथा समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी सेनगाव तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे पत्र पाठविले असून मुंबईच्या पोलिस आयुक्त कार्यालयाकडेही त्याची एक प्रत पाठविण्यात आली आहे. जीव गेला तरी चालेल पण शेती वाचली पाहिजे अशी भुमीका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. आता प्रशासन तसेच शासनाच्या भुमीकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news