

औंढा नागनाथ : नगरपंचायत कार्यालयीन वेळ होऊन देखील अनेक कर्मचारी उशिराने येत असतात. याबाबत नगराध्यक्ष व नागरिकांनी तोंडी सांगितले. यावरुन नगरपंचायतचे मुख्यधिकारी गणेश गांजरे यांनी बुधवार (दि.१६ )एप्रिल रोजी उशिरा येणाऱ्या कर्मचा-यांना धक्का दिला. उशिरा आलेल्या सर्वांना गेटच्या बाहेरच उभे करुन ठेवले होते. गेटला कुलूप लावण्यात आले होते.
औंढा नगरपंचायतमधील कर्मचारी हे उशिराने येत असतात. हे नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश गांजरे यांच्या निदर्शनास आले. या अनुषंगाने नगरपंचायतच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वारे सकाळी 9.50 वाजता बंद करुन त्यांना कुलुप लावण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी दिले होते. यामुळे उशिरा येणाऱ्यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली. गेटबाहेर येऊन मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
सकाळी- सकाळी नगरपंचायतचे गेट कुलुप बंद दिसल्याने काही क्षण कर्मचाऱ्यांसह नागरिक ही बुचकाळ्यात पडले होते. सकाळी कामानिमित्ताने नगरपंचायतीत आलेले नागरिक देखील गेटला कुलूप असल्याने बाहेरच ताटकळत थांबले होते.
कर्मचा-यांनी सकाळी 9..45 वाजता इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आत येणे बंधनकारक राहिल. अतिमहत्वाच्या घरगुती कामामुळे अथवा अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयात येण्यास विलंब होणार असल्यास 9.30 वाजण्यापूर्वी विभाग प्रमुखांनी मुख्याधिकारी यांना वैयक्तिकरित्या व इतर कर्मचा-यांनी नगरपंचायत कार्यालय या व्हाट्सअप ग्रुपवर कारणांसह कळवावे. असे केल्यास संबंधितांना कार्यालयात काही मिनिट उशिरा येण्याची मुभा मिळेल असे निर्देश मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले.