हिंगोली : अवकाळीमुळे गोरेगावसह परिसरात हळद उत्पादक शेतकरी अडचणीत
गोरेगाव, पुढारी वृत्तसेवाः हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोरेगाव येथे दि ३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने उकडुन टाकलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरात गेल्या एक महिन्यापासून हळद काढणी उकडुन टाकणी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. दरवर्षी च्या तुलनेत यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी शेतकरी अजुनही समाधानी आहेत गेल्या एक महिन्यापासून हळद काढणीस सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद उकडुन वाळवणी साठी टाकली आहे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.
३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याची हळदीच्या पिकांचा बचाव करण्यासाठी ताडपत्री घेऊन जाताना धावपळ उडाली होती. हळद पिकाचे मोठे नुकसान झाले असून या पावसामुळे हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून वाळत घातलेली हळद भिजली असून, या हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी हळदीची काढणी करून लवकर विक्री करत होते मात्र पावसामुळं आता विक्री लांबणार आहे तर दरही कमी मिळण्याची शक्यता आहे.
वसमतमध्ये शेतकऱ्यांची तारांबळ
वसमत तालुक्यातील आंबा पांगरा बोखारे, चोंडी ,वरताळा पिंपराळा कुरुंदा या भागामध्ये आज सायंकाळी साडेसहा वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली यामध्ये शेतकऱ्यांचे पिवळे सोने समजले जाणाऱ्या हळदीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. सध्या 50 टक्के शेतकऱ्यांनी आपली हळद काढणी करून शेतात वाळत घातल्या आहेत आणि आज या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यावर अस्मानी संकट आली आहे. सध्या हळदीला 14ते 15000 रुपये भाव अशा या पिवळ्या सोन्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

