जवळाबाजार : फेब्रुवारी महिना संपताच उन्हाच्या झळांनी जवळाबाजारकरांना घामाघूम करण्यास सुरुवात केली आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांना मे महिन्याच्या तीव्रतेची आतापासूनच धास्ती लागली आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळी बाजारपेठेत गर्दी कमी होऊन रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे घरात पंखे, कुलर आणि एसीचा वापर सुरू झाला आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या बजेटनुसार विविध कंपन्यांचे कुलर व एसी विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. नागरिक उन्हापासून संरक्षणासाठी आता टोपी, रुमाल, स्कार्फ आणि गॉगलचा वापर करताना दिसत आहेत.
बसस्थानक परिसर आणि मुख्य चौकांमध्ये थंड पेयांची दुकाने सज्ज झाली आहेत. शरीराला थंडावा मिळावा यासाठी रसवंती गृहे, ज्यूस सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. आरोग्य जपणे गरजेचे: मार्चमध्येच जर तापमान ३६ अंशांवर गेले असेल, तर एप्रिल-मे महिन्यात काय स्थिती असेल, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.