

हिंगोली : पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी रूजू होताच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच अवैध धंद्याची पाळेमुळे उखाडण्यास सुरुवात केल्याने अप्रत्यक्षपणे अवैध धंद्यांना मुभा देणाऱ्या काही ठाणेदारांची अडचण झाली आहे. पोलिस अधिक्षक लोढा यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केल्याने बहुतांश ठाण्याचे ठाणेदार जागे झाले आहेत. बिटस्तरावरील कर्मचाऱ्यांना देखील एसपींची धास्ती लागली असून काही अवैध व्यावसायिक भूमिगत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मित्तभाषी व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी पहिले काही दिवस प्रशासनातील बारकाव्याचा अभ्यास करून यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्ह्यात कायम अवैध धंदे सुरू असल्याची बोंब असते.
यामध्ये प्रामुख्याने अवैध वाळु वाहतुक, गुटखा व अवैध दारूचा समावेश असतो. यावर एसपी लोढा यांनी विशेष लक्ष केंद्रीत करून संबंधित ठाणेदारांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सुचना देत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.
अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या लोढा यांनी आपल्या पोलीस मुख्यालयातून शिस्तीला सुरूवात केली आहे. मुख्यालयासमोर असलेल्या वाहनांची योग्य त्या ठिकाणी पार्किंग करून परिसरातील गजबज कमी केली. त्यानंतर पोलीस मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरीकांना हेल्मेटशिवाय नो एन्ट्री चा निर्णय घेतल्याने पोलीस मुख्यालयाला चांगली शिस्त लागली आहे.
तक्रारदारांच्या तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच पोलीस हे सामान्य जनतेसाठीच असतात अशी भावना नागरीकांमध्ये निर्माण करण्यात पोलीस अधिक्षक लोढा यांना सध्यातरी यश आल्याचे दिसून येत आहे.
पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने शांततेत निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीसांची भुमिका महत्वाची राहणार आहे. सध्यातरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिक्षक लोढा यांची संपूर्ण टिम कार्यरत आहे. एकुणच लोढा यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे सामान्य जनतेतून स्वागत होत असून कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील धास्ती लागली आहे.
हट्टा, औंढा, सेनगाव चर्चेत
पूर्णा नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची चर्चा सुरू असून अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालण्यात अद्यापही हट्टा, औंढा नागनाथ, सेनगाव पोलिसांना यश आले नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना हा प्रकार कसा समजत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षकांच्या नजरेत अवैध वाळू उपशाचा प्रकार पडल्यास संबंधित ठाणेदारांची अडचण होणार असल्याचे बोलले जात आहे.