

हिंगोली : मागील 24 तासात जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. 24 तासात जिल्ह्यातील 30 पैकी तब्बल 27 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर येथील घोरदरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना घडली. कारमधील चौघेही बचावले.
तब्बल दिड महिन्यानंतर हिंगोली जिल्ह्यात गुरूवारी दमदार पाऊस झाला. 24 तासात सरासरी 103.9 मि.मि. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हिंगोली तालुक्यात 145 मि.मि. तर सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यात 70.4 मि.मि. झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला होता. कयाधू नदी पहिल्यादाच दुथडी भरून वाहिली.
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव पुलावरून तसेच हिंगोली तालुक्यातील समगा पुलावरून कयाधू नदीचे पाणी वाहु लागल्याने काही काळ इतर गावांशी संपर्क तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने उसंत दिली. दमदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले.