

औंढा नागनाथ: तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत रोहित्रांची (DP) तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिद्धेश्वर येथील पाणी पुरवठा हेड वर्कच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राला लक्ष्य करण्यात आले. दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अज्ञात इसमाने रोहित्रातील ऑईल खाली सांडून, त्यातील महागड्या तांब्याच्या तारांची मोडतोड केली. या कृत्यामुळे शासनाचे अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशाच प्रकारची दुसरी घटना औंढा नागनाथ येथील जिंतूर फाट्यावरील २० गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर घडली. येथे साधारण १५ जानेवारी २०२६ च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रोहित्रासह स्टार्टरची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या ठिकाणी अंदाजे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या दोन्ही घटनांबाबत ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अभिषेक अशोक गिरी यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंदाजे १ लाख ७५ हजार रुपयांचे एकूण नुकसान झाले आहे. तर पोलीस जमादार हरकाळ आणि आर. वाय. ठाकूर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, दोषींना लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.