

हिंगोली : तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी (दि. २४) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यामुळे रुबीना वाजीद यांचे नगरपरिषदेतील सदस्य पद तात्काळ प्रभावाने रिक्त झाले आहे.
हिंगोली येथील प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी सय्यद ताहेर सय्यद नासेर अली जुल्हा यांनी ॲड. अविनाश बांगर यांच्यामार्फत नगरसेविका रुबीना वाजीद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 'महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५' च्या कलम ४४ अन्वये, कायद्याने विहित केलेल्या दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी गुप्ता यांनी या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतली आणि विविध वैद्यकीय पुराव्यांसह नगरपरिषदेचे अभिलेख तपासले. यामध्ये नगरसेविका रुबीना वाजीद यांना पहिले अपत्य (मुलगा) २६ ऑक्टोबर २००४ रोजी झाले; दुसरे अपत्य (मुलगी) २७ डिसेंबर २००६ रोजी झाले; तर तिसरे अपत्य (मुलगी) २ ऑक्टोबर २०११ रोजी जन्माला आल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम १६ (१) (के) नुसार, ज्या व्यक्तीला दोनपेक्षा अधिक मुले आहेत, ती व्यक्ती सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरते. या कायद्यानुसार, १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या मुलांमुळे जर एकूण अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त होत असेल, तर संबंधित लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. नगरसेविका रुबीना वाजीद यांचे तिसरे अपत्य २०११ मध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, असा भक्कम युक्तिवाद ॲड. बांगर यांनी मांडला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, सादर केलेल्या अधिकृत पुराव्यांवरून रुबीना वाजीद यांना विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध होते. त्यानुसार, नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना नगरपरिषद हिंगोलीच्या सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे. या प्रकरणात अर्जदार सय्यद ताहेर अली जुल्हा यांच्या वतीने ॲड. अविनाश बांगर यांनी बाजू मांडली.