

Hingoli Municipal Election Bangar, Navghare, Mutkule
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तीन नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही निवडणुक जिल्ह्यातील खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी यापुर्वीच जाहीर केली आहे. काँग्रेस, भाजप व इतर पक्षांनी मात्र उमेदवार जाहीर केलेला नाही. अद्यापही उमेदवारीवर शिक्कमोर्तब करण्यात इतर पक्षातील नेतृत्व यशस्वी ठरले नाही. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या पत्नी रेखा बांगर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहणार आहेत. त्यांची उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी त्यांच्या उमेदवारीवर दोन दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे.
मावळत्या नगर पालिकेवर नगराध्यक्ष म्हणून भाजपचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी काम पाहिले होते. हिंगोली पालिकेची जागा ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने आता बाबाराव बांगर यांच्या पत्नी निता बांगर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. शिंदे सेना व भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे उमेदवार जवळपास अंतिम केले आहेत. मागील अनेक वर्ष हिंगोली पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत मात्र शिंदे सेना अन् भाजपने पहिल्यापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू करून उमेदवार देखील निश्चित केले. परंतु, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरविण्यात यश आले नसल्याचे चित्र आहे. काही प्रभागात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसल्याने शहरात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला नेतृत्वच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीकडून पालिकेची निवडणुक आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला आहे. वसमत पालिकेचे नगराध्यक्षपद शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसेच कळमनुरी पालिकेचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे दिले जाणार आहे हिंगोलीच्या जागेबाबत मात्र अद्यापही महाविकास आघाडीत एकवाक्यता झालेली नाही. काँग्रेस किंवा ठाकरे गटाला हिंगोलीचे नगराध्यक्षपद दिले जाईल असे बोलले जात आहे. वसमतमध्ये नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, ठाकरे गट व काँग्रेस या पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीची रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकाँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या असल्याने आमदार नवघरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर ते कसा तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हिंगोली व कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर हिंगोलीत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांना आपले वर्चस्व राखण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. वसमतमध्ये मात्र आमदार नवघरे यांनी ही निवडणुक कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जिकणार असल्याचा दावा केला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वसमत, कळमनुरी नगर पालिकेसाठी आढावा बैठक घेत पक्ष निवडणुकीसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. खासदार आष्टीकर यांची देखील कळमनुरीत प्रतिष्ठा पणाला लागल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली, वसमत, कळमनुरी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. परंतु, अद्यापही एकाही पक्षाला प्रत्येक प्रभागातील उमेदवार देण्यावर एकमत झाले नसल्याचे दिसून येते. परिणामी, अनेक प्रभागात बंडखोरी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी अटळ मानली जात आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने उमेदवारी नाही दिल्यास पर्यायी पक्षाचा देखील पर्याय ठेवल्याचे दिसून येत आहे. एकुणच तीनही नगर पालिकेत नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी बंडखोरीला उधाण येणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली, वसमत, कळमनुरी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. परंतु, अद्यापही एकाही पक्षाला प्रत्येक प्रभागातील उमेदवार देण्यावर एकमत झाले नसल्याचे दिसून येते. परिणामी, अनेक प्रभागात बंडखोरी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी अटळ मानली जात आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने उमेदवारी नाही दिल्यास पर्यायी पक्षाचा देखील पर्याय ठेवल्याचे दिसून येत आहे. एकुणच तीनही नगर पालिकेत नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी बंडखोरीला उधाण येणार असल्याचे बोलले जात आहे.