

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ, सुकली वीर गावातील शेत जमिनीमधून होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कारण या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या जमिनी जात असल्याने शेतकरी पहिल्यापासूनच प्रत्येक ठिकाणी या महामार्गाचा विरोध करताना दिसून येत आहेत. जवळा पांचाळ येथे जमीनी तपासण्यासाठी आलेल्या पथकाला बुधवारी (दि.९) शेतकऱ्याने परत पाठविले.
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे शक्तिपीठ महामार्गाकडून बुधवारी (दि.९) जमिनी माती तपासण्यासाठी एक पथक आले होते. या पथकाने शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता येथील सुधाकर सोनुले यांच्या शेताकडे गेले होते. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना माहिती मिळताच जवळा पांचाळ, डोंगरकडा, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवत जमिनी तपासणी यंत्रणा बंद पाडली. या शेतजमीनीच उपजीविकेचे साधन असल्याने हा शक्तिपीठ रस्ता रद्द करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, पराग अडकिणे, दिगंबर गावंडे, प्रदीप गावंडे, गजानन गावंडे, राहुल अडकिणे, दिलीप सोनुले, शंकर गालीपल्ली, इलियास खान, अजीमखान पठाण, आसिफ खान पठाण, गणेश वानखेडे, रमेश वानखेडे, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.