

गोरेगाव सह परिसरात बैलपोळा सणावर महागाई, दुष्काळाचे दुहेरी संकट; बाजारात शुकशुकाट, शेतकरी करणार साध्या पद्धतीने पोळा साजरा
गोरेगाव : बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळ्यावर यंदा महागाई आणि दुष्काळाचे दुहेरी संकट ओढवले आहे. गोरेगाव सर्कलमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर ही पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणारा पोळा सण यंदा शेतकरी अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत.
बाजारात शुकशुकाट, सजावटीचे साहित्य महागले
दरवर्षी पोळ्याच्या ८ दिवस अगोदरपासूनच गोरेगाव, सेनगाव बाजारपेठ बैलांच्या सजावटीच्या साहित्याने गजबजून जाते. झूल, माळा, बेगड, घुंगरू, वेसण, रंग यांच्या दुकानांवर शेतकऱ्यांची झुंबड उडते. यंदा मात्र चित्र उलटे आहे. झूल ८०० ते १२०० रु., बेगड जोड २०० रु., घुंगरू माळ १५० रु. पर्यंत पोहोचली आहे. महागाईमुळे खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे दुकानांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. विक्रेत्यांनी माल भरला पण गिऱ्हाईकच नाही, अशी स्थिती आहे.
शेतात पीक नाही, बैलाला सजवायचे कसे
सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याअभावी पिवळे पडले आहे. तसे शेतकरी स्प्रिंकलरने पीक जगवण्याची धडपड करत आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अशा स्थितीत सणासाठी हजारो रुपये खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा बैलांना फक्त आंघोळ घालून, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून साध्या पद्धतीने पोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा हा सण. आम्हाला मोठ्या उत्साहात करायचा असतो, पण निसर्गानेच पाठ फिरवली. पीकच नाही तर सणाचा आनंद कसा घ्यायचा?" अशी व्यथा गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
खरीपाच्या पिकांस पावसाची प्रतीक्षा
जवळाबाजार :
खरीप हंगामातील पिकास मागील पंधरा दिवस पासून ढगाळ वातावरण आहे. या परिस्थितीत पाऊस वेळेत पडला नाही तर खरीप हंगामातील उत्पादित मालावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षी मृग नक्षत्र पासून पावसाने मोठ्या प्रमाणात विलंब केला. शेतकरी बांधवाने खरीप हंगामातील पेरणी केली. नंतर फवारणी, खत, डवरणे केले पण. मागील विस दिवस पासून पाऊस पडलेला नाही.
सोयाबीन पिकास मोठ्या प्रमाणात शेंगा लागला तर कापूस बोंड लागले. तुर बहरली पण ऐन पिकास उत्पन्न होण्याचा पिकास पाऊस नसल्याने या वर्षी खरीप हंगामातील उत्पादित मालावर परिणाम होण्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे तर काही ठिकाणावर सोयाबीन पिक उभे शेंगा असलेले वाळत आहेत.
नगदी पीक सोयाबीन आहे. कारण सोयाबीन पिकाचा उत्पन्न वर दिपावली, रब्बी हंगामातील खर्च व कुटुंबातील मंडळी उदरनिर्वाह अवलंबून असतो. दरम्यान, खरीप हंगामातील पेरणीस हजारो रूपय खर्च करूनही खरीप हंगामातील खर्च निघणार नाही, ही मोठी चिंता शेतकरीवर्गाला पडलीय. आता पुढील सणवार, रब्बी हंगामातील पेरणी व कुटुंबातील मंडळींच्या उदरनिर्वाहाची मोठ्या प्रमाणात काळजी लागली आहे . रोजच आकाशाकडे डोळे लावून शेतकरी बांधव मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.