

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी औढा तालुक्यातील विविध गावात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील मौजे हिवरा जाटु येथील शेतकरी शंकर दतराव कर्हाळे यांच्या बांधावर जाऊन कृषीमंत्र्यांनी सोयाबीनच्या जळालेल्या व सुकलेल्या पिकांची पाहणी केली व दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी औंढा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सुकलेली पिके हातात धरून आपली आपबीती मांडली. 'बाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून भरीव मदत केली जाईल', असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार राजू भैय्या नवघरे, आमदार रामराव वडकुते जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.