आंबा चोंडी : वसमत-औंढा महामार्गावरील नवीन सिमेंट रस्त्याचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर एका टोल नाक्याचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. मात्र टोलनाका सुरू होण्याआधीच जिंतूर टी पॉइंट ते शिरड शहापूर दरम्यानच्या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा दुचाकीस्वारांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.
प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक ठिकाणी मोटरसायकलचे टायर जाण्याएवढ्या भेगा पडल्या असून यामध्ये अनेक मोटर सायकलचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला कनेरगाव येथील काही ग्रामस्थ व सरपंच यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर आंबा सर्कल मधील सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. परंतु आजपर्यंत कोणताही अधिकारी निकृष्ट कामाची पाहणी करण्यासाठीसुद्धा फिरकला नाही.
भेंडेगाव गेट येथे सुद्धा रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून येथे दररोज अपघात होत आहेत. महामार्गावर उभारण्यात आलेली शौचालय बंद अवस्थेत आहेत. पार्किंगसाठी वेगळा रस्ता बनवण्यात आला, पार्किंगच्या ठिकाणी लाईट लावण्यात आली मात्री ती देखील बंदच आहे. प्रशासनाने या मार्गावरील सिमेंट रस्त्याला पडलेल्या भेगा त्वरित भरून घ्याव्यात अन्यथा होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आंबा सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.