

हिंगोली : जिल्ह्याला पिवळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून हळदीने नवीन ओळख निर्माण करून दिली. तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये सरकारने हळदीवर प्रक्रिया उद्योग उभारण्याचेही खूप प्रयत्न केले. मात्र काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये भावाबद्दल नाराजी दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी काल मार्केट बंद पाडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. आज दि. २२ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी वाशिम-जिंतूर महामार्गावर हळद पेटवून देत होळी केली. यामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार केली की, १६००० च्या वर भाव असलेली हळद शेतकऱ्यांच्या घरामध्ये आल्यानंतर ती चक्क १२००० खाली येते. तसेच खाजगी व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांकडून मोठी लूट करत आहेत, यामध्ये बटावच्या नावाखाली शेकडा दोन रुपये एवढी रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल केल्या जाते. यामध्ये शेतकऱ्यांना रोख रक्कम न देता व्यापारी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे देत असून तसेच NCDEX जो दर निश्चित करतो, त्या दराने व्यापारी खरेदी करत नसल्याची तक्रार शेतकरी करत होते.
याच अनुषंगाने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हळद जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. जर हळदीचे भाव वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हिंगोलीची हळद फेकून आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करू अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी प्रशासन गोरेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक झळके यांच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यामध्ये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील, विशाल गुंडेवार,सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बुळे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे , सतीश इडोळे तालुका अध्यक्ष प्रवीण मते, शांतीराम पाटील, मनोहर सावके पाटील,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.