

हिंगोली : राज्यात प्लास्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीचा जागर सुरू असतानाच सणामध्ये प्लास्टिक फुलांमुळे नैसर्गिक फुलांकडे कोणी बघत नसल्याचे चित्र आहे. नैसर्गिक फुलांऐवजी नागरिक प्लास्टिकच्या फुले, तुरे, हारांचा वापरास पसंती देत आहेत. त्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात फुलांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे सर्वत्रच फुलांना चांगली मागणी असते. ही मागणी ओळखूनच अलीकडे फुलशेतीकडे शेतकर्यांचा कल वाढला होता. यात प्रामुख्याने झेंडू, निशिगंधाची शेती अधिक केली जाते. परंतु या फुलशेतीच्या मुळावर प्लास्टिक फुले आल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. चार-पाच वर्षापूर्वी झेंडू आणि निशिगंधला चढ्या दराने मागणी होती.
दसरा, गौरी- गणपती, आणि झेंडूला प्रतिकिलो 50 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत दर मिळत होता, तर निशिगंधला प्रतिकिलो 200 रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र विविध उत्सवात प्लास्टिक फुलांचा वापर वाढला आहे. घरगुती गौरी गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सवातील आरास सजावटीसाठीही प्लास्टिक फुलांच्या माळांचा वापर वाढला आहे. केवळ सणासुदीत फुले, माळा व गजरे विक्री करून कुटुंबाची गुजराण करणार्या अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे. या शिवाय पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये लाखो रुपयांचा खर्च करून फुलशेती केली जाते. फुलांना भाव मिळाला नाही, तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. अनेक बेरोजगार युवकांचा फुलशेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे सरकारने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
प्लास्टिक फुलांमुळे झेंडूच्या फुलांना मागणी कमी झाली. प्रतिकिलो 5 ते 10 रुपये भाव मिळतो. उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेक वेळा फुलांना दर मिळत नसल्याने फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले.