कनेरगाव नाका : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर शेळ्या घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्या दगावल्याची घटना गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात चालक व क्लिनर यांना दुखापत झाली नाही.
विदर्भातील मलकापूर भागातून एका ट्रकमध्ये (युपी-७७- एएन-६९७१) शेळ्या भरून हैदराबादकडे नेल्या जात होत्या. सदर ट्रक गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा माळहिवरा शिवारात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला.
या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्याच्या अंगावर ट्रकचा काही भाग पडल्यामुळे या शेळ्या दगावल्या. यामध्ये सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुदैवाने या अपघातात ट्रक चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल घुगे, जमादार आकाश पंडितकर, शंकर इडोळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.