हिंगोली : निष्ठूर काळजाच्या मुलाने आईला दगडाने ठेचून संपविले | पुढारी

हिंगोली : निष्ठूर काळजाच्या मुलाने आईला दगडाने ठेचून संपविले

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक येथे आज (दि. १७ रविवार) सकाळी तरुणाने आईला दगडाने ठेचून मारल्याची घटना घडली. शांताबाई विठ्ठल गायकवाड (वय साठ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी मुलाचे विजय विठ्ठल गायकवाड (वय 38 वर्षे) असे नाव आहे.

डिग्रस बुद्रुक येथील शांताबाई विठ्ठल गायकवाड (वय साठ वर्षे) या महिलेला दोन मुले असून मोठा मुलगा विजय विठ्ठल गायकवाड  बाबुराव विठ्ठल गायकवाड हे दोघे एकत्र राहतात. मोठा मुलगा विजय गायकवाड याचे मागील बरेच वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता विजयचा आई शांताबाई यांच्याशी वाद सुरू झाला. या वादात विजयाने आपल्या जन्मदात्या आईला दगडाने ठेचून मारले. दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण विजय हा समोर येणाऱ्या प्रत्येकाला दगड मारीत होता. गावातील काही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता विजयला धरले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शांताबाई यांना पुढील उपचारासाठी रुग्ण वाहिकेने नांदेड येथे पाठवले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शांताबाई यांचा मृत्यू झाला.

विजय हा आईला ॲम्बुलन्समध्ये घेऊन जाते वेळी गावामध्ये सर्वांना मी आईला दगडाने मारल्याचे सांगत होता. आखाडा बाळापूर पोलिसांना ग्रामस्थांनी ही माहिती दिली. या माहितीनंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी करून मनोरुग्ण विजय विठ्ठल गायकवाड याला ताब्यात घेतले. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे.

Back to top button