हिंगोलीत अल्पवयीन मुलाचे अपहरण गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोलीत अल्पवयीन मुलाचे अपहरण गुन्हा दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली शहरातील श्रीनगर रीसाला बाजार भागातील ११ वर्षीय मुलगा सायकल घेऊन खेळण्याकरता गेला असता तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटूुंबियांनी गुरुवारी १४ मार्चला हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली शहरातील श्रीनगर दिसाला बाजार भागातील आदित्य सागर बक्षी (११) हा इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेतो. बुधवारी ता. १३ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो सायकल खेळण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशीरा पर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. नातेवाईकांकडेही माहिती घेतली असता त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

 या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरासह इतर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र सायंकाळी उशीरा पर्यंत त्याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button