हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कोट्यावधी रुपचे खर्चुन उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल उद्घाटनानंतर अवघ्या २५ दिवसांतच आज (दि.२८) सकाळपासून चाचणीसाठी बंद केला आहे. त्यामुळे वाहन चालकांचे हाल कायम असून उद्घाटनानंतर रेल्वे विभागाला चाचणी का घ्यावी लागली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हिंगोलीत खटकाळी रेल्वे उड्डाण पुलाचे तब्बल पाच वर्षानंतर बांधकाम पूर्ण झाले आहे. ७५५ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे उदघाटन ४ जून रोजी ऑनलाईन पध्दतीने राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहन चालकांची मोठी सोय झाली.
दरम्यान, आज सकाळी अचानक रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला प्लेट लाऊन रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे वाहन चालकांना जुन्याच रस्त्याने वाहतूक करावी लागली. या संदर्भात अधिक चौकशी केली असता उड्डाणपुलाच्या तांत्रिक चाचणीचे काम रेल्वे विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलावरून किती वजन क्षमतेची वाहने धावू शकतात. याची चाचणी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, रेल्वे विभागाने उद्घाटनापुर्वी चाचणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्यांकडे विचारणा केली असता रेल्वे खात्याकडून तांत्रिक तपासणी केली जात आहे. सदर प्रक्रिया नियमित स्वरुपाची असून गुरुवारी दुपारी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा