छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशातील रेल्वे स्थानकाच्या विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे अत्याधुनिक रेल्वे स्थानक होतील. नांदेड ते छत्रपती संभाजीनगरचे विद्युतीकरण झाले आहे. डबलिकरनाची प्रक्रिया सुरू आहे. आता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आज (दि.६) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत ५०८ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी पायाभरणी कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ, आमदार प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, रेल्वे अधिकारी राजेंद्रकुमार विना तसेच संजय केनेकर, अनिल मकरीयेसह इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पंतप्रधानाचे आभार व्यक्त करत त्यांच्या विकासक दृष्टीमुळेच सर्व सामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.
रेल्वे स्थानकाचा विकास होतोय त्याबाबत पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करत छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. परंतु तेथे केवळ दोनच विमान कंपन्या सेवा देत आहेत. अशीच परस्थिती रेल्वे स्थानकाची होऊ नये. शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. कनेक्टिव्हिटीसाठी आपण कमी पडलो, तर केवळ इमारतीचे भव्य दिव्य सांगाडेच उभे राहतील, असा टोला व्यासपीठावरील मान्यवरांना लगावत मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली.
खासदार जलील यांनी कार्यक्रमात काळा ड्रेस घालून एन्ट्री केली. त्यामुळे खासदार निषेध व्यक्त करतात की काय अशी धास्ती मान्यवरांना होती. काही जणांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली. पण खासदारांनी कपडो मे क्या रखा हैं, म्हणत माझा हा पोशाख असून मी निषेध व्यक्त करण्यासाठी आलो नसल्याचे स्पष्ट करताच मान्यवरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हेही वाचा